Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरमध्ये पुराचा हाहाकार

nagpur water
, सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (18:31 IST)
नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (22 सप्टेंबरला) झालेल्या) मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
 
नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या नुकसानासाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
 
नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम अजूनही तैनात ठेवण्यात आली आहे.
 
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतच्या परिसरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचं नुकसान झालं.
 
सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे.
 
नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (22 सप्टेंबरला) झालेल्या पावसाने हाहा:कार उडवला.
 
शासनाच्या विविध विभागांमार्फत शहरात बचाव कार्य सुरू आहे.
 
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजल्यानंतर विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नागपुरकरांची झोप उडवली. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
 
अंबाझरी, गोरेवाडा हे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जवळच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शहरातील नाग नदी आणि पिवळी नदी दुथडी भरून वाहत आहेत.
 
शहरांच्या अनेक भागात गाड्या वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
शनिवारी (23 सप्टेंबर) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 106.7 मिमी इतका पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुसळधार पावसाने शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य बस स्थानक मोर भवन येथे बसेस पाण्याखाली गेल्या आहेत.
 
शंकर नगर, वर्मा ले आऊट, पडोळे चौक, पंचशील चौक या भागात प्रचंड पाणी साठलं आहे.
 
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा
नागपूर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या.
 
तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
नागपुरातील परिस्थितीवर लक्ष - फडणवीस
महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपिन इटणकर, आणि इतर पदाधिकारी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे.
 
“एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.. मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
 
नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे/ अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत.
 
शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे,” ही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परिणिती चोप्रा-राघव चढ्ढा यांची प्रेमकहाणी कधी आणि कशी सुरू झाली?