Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री यांची घोषणा

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री यांची घोषणा
, बुधवार, 28 जुलै 2021 (08:31 IST)
पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेण महाड,नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 
 
महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी दिली. यानंतर ऊर्जामंत्री यांनी राजावाडी तसेच विरेश्वर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली.तसेच महापारेषण अतिउच्चदाब केंद्राची पाहणी केली.
 
महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला.वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर विद्युत विभाग करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असतानादेखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत.त्यांना मी सलाम करतो, त्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ.राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले.
 
पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत.बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१,तर ४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅक्सीनेशन सेंटरपैकी ३, तसेच ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात एकूण ८२,०८२ करोना ॲक्टिव्ह रुग्ण