Publish Date: Tue, 14 Dec 2021 (09:36 IST)
Updated Date: Tue, 14 Dec 2021 (09:37 IST)
भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण जास्त आहे. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ओव्हरस्पीड अशा अनेक कारणांमुळे लोकांना प्राण गमवावे लागतात त्यामुळे आता मोटारवाहन कायद्यानुसार वाहतूकीचे नियम मोडणार्यांविरुद्ध दंडाच्या रकमेत वाढ आहे.
आता अनधिकृत वाहन चालकाला पूर्वीच्या दोनशे रुपयांऐवजी थेट पाच हजार रुपये तर वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्याला दोनशे रुपयांऐवजी एक हजार ते दहा हजारांचा दंड मोजावा लागणार आहे. त्यामुळेच वाहतूकीचे नियम न मोडण्याचे आवाहनही उपायुक्त पाटील यांनी केले आहे.
नविन मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. सुधारित अधिनियमानुसार ई-चलन प्रणालीमध्ये ११ डिसेंबर २०२१ रोजीच्या मध्यरात्रीपासून ही नवीन दंड आकारणी सुरु झाली आहे. यामध्ये विविध १९४ कलमांचा समावेश आहे. त्यापैकी ५४ कलमे ही तडजोड न करता येणारी असून १४० कलमे ही तडजोड योग्य आहेत. तडजोड योग्य सर्व कलमान्वये कारवाई सुरु केली असून एकापेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंडाची रक्कम ही मशिनद्वारे आपोआप आकरली जाणार असल्याचेही उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
या नविन नियमानुसार पोलिसांचा आदेश नाकारल्यास पूर्वीच्या दोनशे रुपयांऐवजी सुरुवातीला पाचशे त्यानंतर दीड हजारांचा दंड घेतला जाणार आहे. विना लायसन्स आणि परवाना संपूनही वाहन चालविल्यास पाचशे ऐवजी थेट पाच हजारांचा दंड आकारणी होईल. तर वाहनांची शर्यत लावणा:यांना सुरुवातीला पाच हजार तर दुस:यांदा दहा हजार रुपयांचा फटका बसणार आहे. वाहनाचा वीमा नसल्यास दोनशे ऐवजी आधी दोन हजार नंतर चार हजार आकारणी होईल.