Publish Date: Sat, 22 Apr 2017 (11:45 IST)
Updated Date: Sat, 22 Apr 2017 (11:49 IST)
1857 च्या कालखंडात ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेचा सुर्य कधीच मावळणार नाही अशी परिस्थीती होती. अनेक देशभक्तांनी या काळात स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटीशांच्या विरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. पुढे हा गणेशोत्सव अधिकाधिक व्यापक होत गेला. गणेशोत्सवाचे महत्व कालही होते, आजही आहे व भविष्यातही राहील. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसुन ते सामाजिक अभिसरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिनांक 21 एप्रिल रोजी एनसीपीए सभागृह मुंबई येथे लोकमान्य टिळक गणेशोत्सव स्पर्धेच्या राज्यस्तरीय पारितोषीक वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा, राजपुरोहित, पंकज देशमुख, सांस्कृतीक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सन 2016-17 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातुन लोकमान्य महोत्सव आयोजित करण्याचे जाहीर केले होते. या लोकमान्य महोत्सवाच्या निमीत्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे राज्य स्तरीय पारितोषीक वितरण या सोहळण्यात करण्यात आले.