Publish Date: Fri, 07 Feb 2020 (12:41 IST)
Updated Date: Fri, 07 Feb 2020 (12:45 IST)
काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यच्या यांच्यावर टीकास्त्र सोडत, आरोप करीत पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. इंदापूर
मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली मात्र त्यांना निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. आता राज्यात भाजपची सत्ता आली नसल्याने पाटील हे वेगळा विचार करीत असून त्यामुळे ते शिवसेनेच संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे त्यांची वेगळी वाटचाल सुरू झाल्याचा तर्क करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचीही भेट घेऊन आपल्यातील मतभेदाला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीची आठकाठी येऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.