Publish Date: Wed, 14 Oct 2020 (15:46 IST)
Updated Date: Wed, 14 Oct 2020 (15:48 IST)
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जोरदार सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. प्रामुख्याने कोल्हापूरमधील करवीर तालूक्यातील पश्चिम भाग आणि गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. पिके झोपली, तसेच नागरिकांच्या घरांचे पत्रेही उडाले. कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवार 17 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सोलापूर मध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे. जवळपास ८६० मिमी इतका पाऊस जिल्ह्यात झालाय. लातूर जिल्ह्यातील रात्री पासून बरसत असलेल्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ही ६८ मिमी इतकी आहे. तर सर्वाधिक पाऊस हा निलंगा तालुक्यात ११० मिमी इतका झाला आहे.