Publish Date: Thu, 14 Oct 2021 (22:05 IST)
Updated Date: Thu, 14 Oct 2021 (22:07 IST)
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कोकणासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. राज्यात पुन्हा एकदा 16 ते 18 दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही संलग्न जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने परभणी, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.