Publish Date: Mon, 27 Aug 2018 (08:50 IST)
Updated Date: Mon, 27 Aug 2018 (08:53 IST)
राज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पूर्व भारतात तय़ार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यमुळे 27 आणि 28 ऑगस्टला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानुसार गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. त्यातून काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता असेल. राज्यातल्या इतर भागातील हवामानात विशेष बदल होणार नाही. 28 ऑगस्टनंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.