Publish Date: Tue, 29 Jan 2019 (17:12 IST)
Updated Date: Tue, 29 Jan 2019 (17:18 IST)
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले. एकूण सहा राज्यांसाठी मिळून ७२१४.०३ कोटी रुपयांचे पॅकेज केंद्र सरकारने जाहीर केले असून, त्यापैकी महाराष्ट्रासाठी सर्वाधिक ४७१४.२८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी ही माहिती दिली. येत्या शुक्रवारीच केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करेल, त्यापूर्वीच सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली.
या पॅकेजमध्ये आंध्र प्रदेशसाठी ९००.४० कोटी रुपये, उत्तर प्रदेशसाठी १९१.७३ कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी ३१७.४४ कोटी रुपये, गुजरातसाठी १२७.६० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ९४९.४९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळ निवारणाच्या विविध कामांसाठी या निधीची राज्य सरकारला मदत होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी १३.०९ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.