Publish Date: Mon, 28 Mar 2022 (09:57 IST)
Updated Date: Mon, 28 Mar 2022 (10:03 IST)
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या हरिविहार सोसायटीमध्ये एका बंद गाळ्यात मानवीय अवशेष आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या सोसायटीमध्ये दोन गाळे आहेत जे अनेक वर्षांपासून बंद आहेत. या पैकी एका गाळ्यातून गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंध येत असल्याने रहिवासी वैतागले होते. हा वास कुठून येत आहे याचा शोध लावत ते या गाळ्याजवळ आले आणि त्यांना गाळ्याच्या शटर चे पत्रे एका बाजूने सडलेले दिसले त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले.
घटनास्थळी पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात पोहोचला. गाळा उघडतातच त्यात काही भंगाराचे साहित्य लाकडी आणि लोखण्डी वस्तू होत्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित दोन प्लस्टिक चे डबे आढळले .ते उघडून पाहतातच संपूर्ण वातावरणात दुर्गंध पसरला. आणि त्यात द्रव रसायनात मानवी अवयव जतन करून ठेवलेले दिसले. या डब्यात आठ कान, डोळे ,मेंदू सदृश्य अवयव आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञ देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हे डबे ताब्यात घेतले. पोलिसांनी गाळामालक शिंदे यांना बोलावले आणि त्या मानवी अवयवां बद्दल विचारपूस केली. शिंदे यांचे दोन मुलं डॉक्टर असून एक डेंटिस्ट तर दुसरा इएन टी तज्ञ आहे. त्यांनी काही वर्षा पूर्वी ते अवयव वैद्यकीयशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणलेले असावे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्यांच्या कडून विचारपूस करत प्रकरणाचा तपास करत आहे.