Publish Date: Mon, 20 Feb 2023 (08:47 IST)
Updated Date: Mon, 20 Feb 2023 (08:50 IST)
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. असा नक्कीच होता की, मोदींच्या सभेत मोदींचा मुखवटा घालून येत होते, मात्र आता दिवस बदलले आहेत, आता मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावे लागते, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. लढायचे असेल तर मैदानात लढा. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणा, आम्हाला जे काय म्हणायचे ते आम्ही म्हणू. जनता निर्णय करेल. कारण, तीच सर्वात उच्च न्यायालय आहे. जनतेला निर्णय घेऊ द्या. हीच तर लोकशाही आहे. मात्र यांना लोकशाही मान्य नाही, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला दिले.
मी लढवय्या बापाचा लढवय्या मुलगा आहे
माझ्या वडिलांनी शिकवले आहे की, अन्यायाविरोधात लढाई करा. लढवय्या बापाचा लढवय्या मुलगा आहे. कधीच खोटे बोलणार नाही. खोटे बोलणे माझ्या रक्तात नाही. म्हणूच मी म्हटले, असे असेल तर मी सोडतो. त्यावेळी तर हे सांगण्यात आले होते की, तुम्ही निवडून आला आहात लक्षात ठेवा मोदींचा चेहरा तुम्ही वापरला आहात. त्यावेळी तर युती होती. आमच्या पोस्टरवर मोदींचा चेहरा होता, त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा होता. एक काळ असा नक्कीच होता की मोदींच्या सभेत मोदींचा मुखवटा घालून येत होते, मात्र आता दिवस बदलले आहेत, आता मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावे लागते, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.