Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितेश राणे : 'कोर्टाच्या निर्णयाचा आदर, न्यायालयात सरेंडर होतोय'

nitesh rane
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (15:53 IST)
न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो. सरेंडर करण्यासाठी मी न्यायालयासमोर जातोय, असं भाजपा नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात ते हजर झाले आहेत.
 
न्यायालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
दरम्यान, शरणागती पत्करण्यासाठी जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी या सरकारने मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचे प्रयत्न केले होते. आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवत मी शरणागती पत्करत आहे, असं म्हटलं होतं.
 
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
 
मंगळवारी सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि नितेश राणे यांना 10 दिवसांत शरण येण्याची मुदत देण्यात आली होती.
 
त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नितेश राणे हे 28 जानेवारीला न्यायालयासमोर हजर झाले.
 
नितेश राणे यांच्या वकीलाने राणे यांची बाजू कोर्टासमोर मांडत नियमित जामिनासाठी अर्ज केला. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद पार पडला.
 
न्यायालयाबाहेर बाचाबाची
जामीन फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पोलिसांनी काही वेळ नितेश राणे यांना थांबवण्यास सांगितलं. आम्ही वरिष्ठांशी बोलत आहोत असं पोलिसांचं म्हणणं होतं.
 
यावेळी राणे समर्थकांची मोठी गर्दी न्यायालयाबाहेर जमली. नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तुम्ही कोणत्या अधिकाराखाली आम्हाला थांबवत आहात असा प्रश्न पोलिसांना त्याठिकाणी विचारण्यात आला.
 
नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण
संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट करत म्हटलंय की, "सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे.
 
"सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात दाखल झालेल्या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टासमोर शरण जाण्याचे आणि नियमित जामीन घेण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत."
 
याआधी मुंबई उच्च न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीण अर्ज फेटाळला होता.
 
त्यावेळी संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे मुख्य आरोपी असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टाला दिली होती. तर माझ्यावर दाखल गुन्हा राजकीय षड़यंत्राचा भाग असल्याचा आरोप नितेश राणे यांनी कोर्टात केला होता.
 
काय आहे प्रकरण?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते.
 
18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.
 
एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नीतेश राणेंना कळवायला पाहिजे, असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
 
याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

57 देशांमध्ये आढळला नवीन सब-व्हेरियंट BA.2, ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरत आहे, जाणून घ्या किती धोकादायक आहे?