Publish Date: Sat, 03 Feb 2024 (09:39 IST)
Updated Date: Sat, 03 Feb 2024 (09:45 IST)
महाविकास आघाडीसोबत जाणार का त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलताना म्हणाले की, 'यांच्याकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.
तर टोलसंबधी विषयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, माझा टोलला विरोध नाही, टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याला विरोध आहे. टोल या विषयावर मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी उद्या भेट घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील टोलनाक्यावरील आम्ही जे चित्रण केलं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवणार आहे. टोलमधून जमा होणाऱ्या पैशाबाबत मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. टोलचा पैसा अनेक पक्षांना पक्ष निधीसाठी वापरला जातो. यासंबधी मलाही ऑफर आली होती, मी म्हटलं इथेच मारेल तुला, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तरी देखील मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असं म्हटलं आहे. त्यावर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. तुमच्या मनासारखं घडलं मग उपोषण कशाला असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर देशात आणि राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी कारवाई होताना दिसत आहे. नुकतेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने ५ वेळा समन्स बजावलं आहे. सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यावर होणाऱ्या कारवाईवरती देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात सुरू असलेलं राजकारण भविष्यात भाजपला परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर उद्या हातातून सत्ता गेल्यास काय होईल याचा विचार देखील सत्ताधाऱ्यांनी करायला हवा असं देखील त्यांनी पुढे म्हटलं आहे.
नाही तर मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल
मी नाशिकला का येत नाही, तर मला नाशिककरांनी मतदान केले म्हणून नाही तर अंतर्गत गटबाजीमुळे तुमच्या गटबाजीमुळे वीट आला आहे. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, नाही तर मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल. उठसूठ मुंबईत गाऱ्हाणे घेऊन येतात, तुम्हाला आता शेवटचे इंजेक्शन द्यायला आलोय, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यासपीठावर व पहिल्या रांगेतील खुर्च्यांवर बसलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोल सुनावले.
सुरुवातीला बातमी बाहेर जाता कामा नये, असा सज्जड दम दिला. मी नाशिकला का येत नाही, असा सवाल उपस्थितांना विचारला. यातील सत्ताकाळात कामे करूनही नाशिककरांनी मतदान केले नाही म्हणून आपण नाराज आहात, असे सांगितल्यावर त्यास नकार दिला. दुसऱ्या एकाने गटबाजीमुळे आपण येत नाही, असे सांगताच बरोबर असे उत्तर देत राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला.
गटबाजी करू नका, एकोप्याने काम करा. संघटनेच्या कामांचा वीस दिवसांनी आढावा घेवू. कामात प्रगती दिसून आली नाही तर पदे काढून घेणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आता यापुढे तक्रारी आल्यास सहन करणार नसल्याचे ते म्हणाले.
Edited By - Ratnadeep ranshoor