Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घाई केली तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, सण-उत्सव नंतरही साजरे करता येतील: मुख्यमंत्री

घाई केली तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, सण-उत्सव नंतरही साजरे करता येतील: मुख्यमंत्री
, सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (15:33 IST)
महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून अमेरिकेत कोरोनामुळे जीवन अत्यावस्त झाले आहे. महाराष्ट्रासह केरळ राज्यात देखील कोरोनाची स्थिती वाईट आहे. केरळ येथे रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. अशात धोक्याचा इशारा समजून जर परिस्थितीचं गांर्भीय पाळलं नाही तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
 
कोरोनाच्या परिस्थितीसाठी सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा, नियम पाळा,  मास्क घाला असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांसह सत्तेतील घटक पक्षांनाही केले आहे.
 
कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस चढ-उतार दिसून येत असताना या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दी होणारे कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, आणि म्हणूनच इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमात राहून साजरे करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
 
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
 
तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही
'हे उघडा ते उघडा' या मागण्या योग्य असल्या तरी त्यातून धोका वाढत आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जीवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जीवावर विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पाहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
 
तसेच कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुललं