Publish Date: Wed, 22 Feb 2023 (21:50 IST)
Updated Date: Wed, 22 Feb 2023 (21:55 IST)
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. या सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत, असं म्हणता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती आणणं, ही तातडीची गरज आहे, असं सर्वोच्च न्यायालयाला वाटलं नसावं, त्यामुळे त्यांनी स्थगिती देण्यास नकार दिला असेल, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.
नावावर भाष्य करताना उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही, त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत, असं म्हणता येणार नाही. कारण नैसर्गिक न्यायदान तत्त्वानुसार, न्यायालयाला दुसऱ्या बाजुचंही ऐकावं लागतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, आम्ही शिंदे गटालाही ऐकू आणि निवडणूक आयोगालाही ऐकू… यासाठी न्यायालयाने दोघांनाही नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणावर आठ दिवसांनी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोन्ही बाजुंचं ऐकलं जाईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.”
त्याचबरोबर आम्ही निवडणूक आयोगाच्या निकालाचा फायदा घेणार नाही. म्हणजेच आम्ही आमच्या पक्षाचा नवीन व्हीप काढणार नाही. तो व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना बजावणार नाही, असं शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयाला अभिवचन दिलं आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिलं असलं तरी याचा दुरुपयोग त्यांनी करू नये, याची खबरदारी सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. कोणताही व्हीप बजावणार नाही , असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालावर तातडीने स्थगिती आणणं, सर्वोच्च न्यायालया गरजेचं वाटलं नसावं,” अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
Edited by: Ratnadeep Ranshoor