Publish Date: Wed, 01 Mar 2023 (08:11 IST)
Updated Date: Thu, 02 Mar 2023 (13:14 IST)
भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत मनीष सिसोदिया यांनी दारूवाल्यांवर खैरात वाटल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती, असा आरोप भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे केला आहे. त्यांच्या या आरोपांना अरविंद सावंत यांनी उत्तर देत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मद्य धोरणामुळे लिकर लॉबीला कोट्यवधींचा लाभ मिळवून दिल्याच्या आरोपाखाली दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या सीबीआय कोठडीत आहेत. असाच काहीसा घोटाळा महाराष्ट्रातही झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. दिल्ली सरकारप्रमाणेच तत्कालीन मविआ सरकारनेही विदेशी दारुवरील कर माफ केला होता. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत दिली होती. तसेच, वाईन किराणा दुकानात विकण्यासही परवानगी दिली होती. असे आरोप त्यांनी केले त्यांच्या या आरोपांना अरविंद सावंत यांनी उत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांच्या या आरोपांनंतर अरिंद सावंत यांनी आशिष शेलार घेऊन (मद्य) ट्वीट करतात का..? असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे अरविंद सावंत यांचे वक्तव्य..?
आधी पीएम केअर फंडाची माहिती द्या, असे म्हणत तुम्ही अडानी ग्रुपबाबत गप्प का? असा सवालही सावंत यांनी केला आहे. तसेच आशिष शेलार यांच्या ट्विटचा मी निषेध करत असून उध्दव ठाकरे यांची लोकप्रियता बघून त्यांच्या पायाची वाळू सरकत असल्याने आशिष शेलार असे बोलत आहेत..आशिष शेलार यांनी ट्वीट करतांना घेतली होती का,” असे खळबळजनक वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले आहे. त्यामुळे आशिष शेलार आता यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हंटले होते आशिष शेलार
शेलार ट्वीटमध्ये म्हणतात, आप पक्षाचे सिसोदिया हे ज्याप्रमाणे दारू उत्पादकांसाठी विशेष योजना तयार करत होते. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातही मविआ सरकार तळीरामांसाठी सरकार चालवत होते. असा आरोप शेलार यांनी केला आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. विदेशी दारुवरील कर माफ, बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत, वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी हे सर्व आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत?, महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार?, म्हणूनच श्री.अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले?, दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात? असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor