Publish Date: Wed, 04 Jan 2023 (07:47 IST)
Updated Date: Wed, 04 Jan 2023 (08:14 IST)
कोल्हापूर :गिरीडीह (झारखंड)येथील सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. सकल जैन समाजातर्फे दसरा चौक येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक महामोर्चा काढण्यात आला. या मूक महामोर्चासाठी कोल्हापूर, बेळगाव, सांगली, विजापूर जिह्यातील जैन श्रावक, श्राविका, आबाल वृद्ध, युवक,युवती,नोकरदार,शेतकरी,व्यावसायिक,व्यापारी व सर्व सकल जैन समाजातील व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.या महामोर्चात महिला भगव्या साडीत तर पुरुष पांढऱ्या कपड्यात दिसले.
झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे.परंतु सम्मेद शिखरजी हे समस्त जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेने याची पवित्रता नष्ट होणार आहे.सम्मेद शिखरजी हे पर्यटक क्षेत्र न राहता,तीर्थक्षेत्र म्हणून रहावे या मागणीसाठी,सकल जैन समाजाच्या वतीने मूक महामोर्चा काढण्यात आला. हा मूकमोर्चा दसरा चौक येथून,बिंदू चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गुजरी,महाव्दार रोड,पापाची तिकटी,लुगडी ओळ,फोर्ड कॉर्नर,बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता झाली.
झारखंड सरकारने या पर्यटन स्थळाविषयीचा निर्णय रद्द करून या पवित्र स्थानाला जैन धर्मियांचे तीर्थस्थळ असे घोषित करावे. सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे सर्वोच्च स्थान असून ही मोक्ष भूमी आहे. संपूर्ण देशातील जैन समाजाचे हे श्रद्धास्थान आहे, या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळ बनविल्याने येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. सम्मेद शिखरजी हे 28 किलोमीटर उंचीवर आहे. या ठिकाणी जैन समाजाचे श्रावक हे पायीच चालत जातात. जैन धर्माचे एकूण 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकर हे या पवित्र स्थळातून मोक्ष मार्गाला गेलेले आहेत. त्यामुळे या पवित्र स्थळाला जैन धर्माचे तीर्थ स्थळ म्हणून घोषित करावे, अशी समस्त जैन समाजाची मागणी आह.
Edited by : Ratnadeep Ranshoor