Publish Date: Thu, 11 Jul 2019 (16:20 IST)
Updated Date: Thu, 11 Jul 2019 (16:31 IST)
मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातही मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. खडकवासला धरण भरल्यानंतर आता मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्गही सुरू केला आहे. या पाण्याच्या विसर्गानंतर नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांना सासनाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे. मुसळधार सततच्या पावसाने खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. यानंतर मध्यरात्री दोन वाजल्यापासून मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यानंतर नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. कारण मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याचा वेग १७०० क्युसेक इतका आहे.पुरेसा जलसाठा झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कारण असे अनेक ठिकाणं आहेत जिथे कमी प्रमाणात पाऊस झाला आहे आणि तेथील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पिंपळगाव, जोगे, घोड आणि नाझरे या धरण क्षेत्रात खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खकडकवासला धरण पूर्ण भरल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आणखी दिलासादायक बाब अशी की, केवळ खडकवासलाच नाही तर, पुण्यातील कळमोडी धरणही शंभर टक्के भरले आहे.