Publish Date: Thu, 17 May 2018 (09:04 IST)
Updated Date: Thu, 17 May 2018 (09:14 IST)
बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे सीमाभागात मराठी भाषिकांच्या फुटीवरून वातावरण तंग झाले असतानाच भाजपचे दक्षिण मंदिर पराभूत उमेदवार अभय पाटील यांच्या समर्थकांनी एकीकरण समितीचे नेते आणि ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर यांच्या निवासस्थानावर दगडफेक करून फटाके फोडल्याने सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच स्तरांतून भाजपच्या या दहशतीचा निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, मराठी भाषिकांची एवढी मते फुटली जाऊच शकत नाहीत. शिवाय एका उमेदवाराला लाखभर मते पडणेही शक्य नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम’मुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्याचा दावा मराठी भाषिकांकडून करण्यात येत आहे. माजी मंत्री जगदीश शेट्टर यांच्या निकालामुळे हे स्पष्ट झाले आहे. मराठी माणसांची संख्या मोठी असतानाही बेळगाव शहर आणि परिसरातील चार मतदारसंघांपैकी तीन उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा सारा प्रकार ‘ईव्हीएम’मुळे झाल्याचा दावा किरण ठाकूर यांनी केला आहे.