Publish Date: Thu, 08 Aug 2019 (15:53 IST)
Updated Date: Thu, 08 Aug 2019 (15:55 IST)
कोल्हापूर जिल्ह्यात महापूराने परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग ठप्प झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गा क्रमांक चारसह सर्वच मार्गांवर वाहतूक खोळंबल्याने व महापुराने वेढा घातल्याने जिल्ह्याला होणारा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे.
गोकुळचे लाखो लिटर दुध रस्त्यावर अडकल्याने ते दूध आता खराब होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर शहराभोवती पुराची मगरमिठी अधिकच घट्ट झाली आहे. शेकडो घरांत पुराचे पाणी शिरल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. दोन दिवसांत घरातील जेवण-खाद्यपदार्थ व पाणी संपल्याने पूरग्रस्त जीवाच्या चिंतेबरोबरच तहान-भुकेने व्याकूळ झाले आहेत.