Publish Date: Mon, 11 May 2020 (08:24 IST)
Updated Date: Mon, 11 May 2020 (08:25 IST)
राज्यातली विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यामुळे मुख्यमंत्र्यांना कोरोना विरोधातल्या लढ्यावर लक्ष केंद्रित करता आलं असतं, असं ते म्हणाले.
उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
भाजपा तर्फे प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नीलम गोऱ्हे रिंगणात आहेत. काँग्रेसनं राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा केली आहे.