Publish Date: Fri, 03 Apr 2026 (10:23 IST)
Updated Date: Fri, 03 Apr 2026 (10:27 IST)
मुंबई शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शाळांमध्ये दररोज समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असून MIM ने याला तीव्र विरोध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' सक्तीचे करण्याच्या प्रस्तावावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
शिवसेना (UBT) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेत हा प्रस्ताव मांडला आहे. मुंबईतील सर्व महापालिका शाळांमध्ये आणि ज्या खाजगी शाळांमध्ये 'मराठी' अनिवार्य आहे, तिथे दररोजच्या परिपाठात 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि चारित्र्य संवर्धन करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे.
एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. "शाळेत विविध जाती-धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यामुळे अशा प्रकारे धार्मिक किंवा विशिष्ट विचारधारेचे श्लोक कोणावरही लादले जाऊ नयेत," अशी त्यांची भूमिका आहे. विरोधकांनी हा मुद्दा धर्मनिरपेक्षतेशी जोडला असून, शिक्षण धोरणात अशा सक्तीला स्थान नसावे असे म्हटले आहे.
बीएमसी प्रशासनाने यापूर्वी भाजपच्या एका नगरसेविकेने मांडलेला 'योगासने सक्तीची' करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे 'मनाचे श्लोक' बाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रस्ताव आता महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला जाईल. त्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय होईल.
Edited By- Dhanashri Naik