Publish Date: Mon, 21 Dec 2020 (16:38 IST)
Updated Date: Mon, 21 Dec 2020 (16:40 IST)
सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होणार असल्याचं भाकीतही भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
येत्या काळात अनेक लोकांचे भाजपात प्रवेश होणार आहेत, काहीजण रोज वावड्या उठवतात की भाजपाचे लोक आमच्याकडं येणार आहेत. पण, कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी या पुंग्या वाजवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तिन्ही पक्षात अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, म्हणून असं बोललं जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितंल. तसेच, सर्वांना हेही माहितीय की, देशाचं भविष्य हे राहुल गांधी नाही, युपीए नाही. तर, या देशाचं वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे, एकादं धोक्यानं आलेलं सरकार किती काळ चालतं? कसं चालतं, यासंदर्भातील सगळी माहिती सगळ्यांना आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढावं ही तर माझीच इच्छा आहे, त्यांनी जरुर लढावं, असं आव्हानंही फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय.