Publish Date: Thu, 14 Oct 2021 (13:28 IST)
Updated Date: Thu, 14 Oct 2021 (13:29 IST)
या महिन्यात कोकणामध्ये ८ हजार २०५ घरांची लॉटरी काढली जाणार आहे. संगणक प्रणालीद्वारे १४ ऑक्टोबरला लॉटरी काढण्यात येईल. २३ ऑगस्टला लॉटरीची जाहिरात देण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हाडाच्या विविध योजनांची सुद्धा माहिती दिली.
नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद येथे येत्या दोन वर्षामध्ये कमीत कमी ७ ते १० हजार घरांची निर्मिती करुन तीही लॉटरीमध्ये आणणार आहोत. म्हाडावरील लोकांचा जो विश्वास आहे तो आम्हाला द्विगुणीत होताना दिसत आहे. यापुढे म्हाडाची घरांचा दर्जा हा चांगलाच असेल. विशेष म्हणजे आता निविदा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. यापुढे काही झाले तर त्याची जबाबदारी बिल्डरवर राहील. तो बिल्डिंग बांधून ती म्हाडाकडे देऊन मोकाट सुटणार नाही, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.
घरांसाठी अर्जाची रक्कम असून ती अर्जासोबत भरायची रक्कम ईडब्ल्यूएस करिता ५ हजार, एलआयजीकरिता १० हजार, एमआयजीकरिता १५ हजार आणि एचआयजी करिता २० हजार रुपये ही रक्कम असेल. तसेच प्रवर्ग निहाय उत्त्पन्न मर्याद ईडब्ल्यूएसकरिता २५ हजार, एलआयजी करिता २५ हजार ते ५० हजार, एमआयजीकरिता ५० ते ७५ हजार आणि एचआयजी करिता ७५ हजारापेक्षा जास्त असणार आहे.
संपूर्ण सोडत पारदर्शी होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठित केलेली असून त्यांच्या उपस्थितीत पूर्ण प्रक्रिया होणार आहे. सोडतीमधील अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईनद्वारे जमा केली जाईल.