Publish Date: Mon, 09 Jun 2025 (20:49 IST)
Updated Date: Mon, 09 Jun 2025 (20:54 IST)
ठाणे रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या नंतर राजकारण सुरु झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या अपघाताबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी रेल्वे व्यवस्था कोलमडण्यासाठी इतर राज्यांमधून मुंबईत येणाऱ्या स्थलांतरितांना जबाबदार धरले आहे.
गर्दी पाहता लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या मागणीच्या वैधतेवरही राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) अध्यक्ष शरद पवार यांनी गर्दी लक्षात घेऊन लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाला केले आहे.
मनसे प्रमुख ठाकरे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बाहेरून मुंबईत येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे रेल्वे व्यवस्था कोलमडली आहे. पण सर्वजण निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, दररोज लोकल ट्रेनशी संबंधित घटना घडत असतात. हे फक्त रेल्वेबद्दल नाही तर आपल्या सर्व शहरांची अवस्था वाईट आहे. ते म्हणाले की, योग्य रस्ते नाहीत. मुंबई आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही एक नियमित समस्या आहे. जर कुठे आग लागली तर अग्निशमन दल वेळेवर पोहोचू शकत नाही.
मंत्री परदेशी दौरे करून काय पाहतात हे त्यांनाच माहित. रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मेट्रोसाठी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली उंच इमारती बनत आहे. मात्र वाहनतळांची काहीच व्यवस्था नाही. रेल्वे अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. रेल्वे मंत्र्यांनी अपघातास्थळी जाऊन पाहणी करून सुधारण्यासाठी प्रयत्नकेले पाहिजे. मात्र असे होत नाही म्हणत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.