Publish Date: Mon, 16 May 2022 (08:55 IST)
Updated Date: Mon, 16 May 2022 (08:57 IST)
नैऋत्य मान्सून येत्या 24 तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळं पुढच्या 5 दिवसात अंदमान - निकोबार बेटांवर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. केरळमधल्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी देशाच्या वायव्य भागात तसंच मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून येत्या 2 दिवसात त्याची तीव्रता कमी होईल, असंही हवामान विभागानं म्हटलंय.
दुसरीकडे राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान विभागानं दिला आहे.