अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, औरंगाबादमधील औरंगजेबाची कबर खोदून फेकून देण्याची विनंती त्या महाराष्ट्र सरकारला करतील.ज्यांना ती कबर आवडते त्यांनी आपल्या घरात सजवावी.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला महान असल्याचे विधान केल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले आणि त्यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली.
राजकीय वातावरण तापलेले पाहून अबू आझमी यांनी आपल्या विधानाबद्दल जाहीर माफी मागितली आहे.
या प्रकरणात भाजपच्या नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अबू आझमीचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, मी महाराष्ट्र सरकारला आवाहन केले आहे. ज्या प्रमाणे औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज नगर करण्यात आले त्याच प्रमाणे औरंगजेबाची कबर देखील उपटून काढून टाकावी.
काल एका आमदाराने विधान केले की औरंगजेब हा महान शासक होता. त्याने चांगल्या सेवा दिल्या. या वर नवनीत राणा यांनी म्हटले, आम्ही इतिहास वाचला आहे. ज्यांनी इतिहास वाचला नाही त्यांनी चित्रपटगृहात जाऊन छावा चित्रपट पाहावा. तुमच्या वडिलांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा कसा छळ केला. ते पाहावे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते ज्या प्रकारे औरंगाबादचे नाव बदलण्यात आले त्याच प्रकारे औरंगजेबाची कबर उपटून काढून फेकावी. आणि ज्यांना ती कबर आवडते त्यांनी आपल्या घरात नेऊन सजवावी.