Publish Date: Mon, 21 Jun 2021 (08:56 IST)
Updated Date: Mon, 21 Jun 2021 (08:58 IST)
अलीकडच्या काळात शिवसेनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुणी गेलंय असं झालं नाही. प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट येईल असं वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांच्या मतदारसंघात कोणी पक्षात प्रवेश केलाय का हे पाहावं लागेल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आरोप फेटाळून लावलेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी पत्रात नाहक त्रास थांबेल असं सांगितल्याने हा गंभीर आरोप असून त्याचा सर्वांनी अभ्यास करावा. एका आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावर काय बोलणार? हे पत्र खरं असल्यास त्यात एक मुद्दा असा आहे की आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे.