Publish Date: Mon, 28 Jan 2019 (09:07 IST)
Updated Date: Mon, 28 Jan 2019 (09:08 IST)
स्वप्न दाखवणाऱ्या नेतेमंडळींना जनतेची पसंती मिळते खरी. पण, ही स्पप्न पूर्ण न झाल्यास याच जनतेचा रोषही ओढावला जातो, अशा आशयाचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळ्याला ते बोलत होते.
'स्वप्न दाखवणारी नेतेमंडळी जनतेला आवडतात, त्यांना जनतेची पसंती मिळते. पण, जर का ही स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर मात्र याच राजकीय पटलावर जनता नेतेमंडळींना दणकाही देते', असं ते म्हणाले. इतर नेतेमंडळी आणि अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षांविषयी वक्तव्य करत असतानाच त्यांनी स्वत:विषयीसुद्धा सूचक विधान केलं. मी फक्त स्वप्न दाखवत नाही तर, ती पूर्णत्वासही नेतो, असं ते म्हणाले.
मुंबईतील माध्यमांचे बरेच प्रतिनिधी मला ओळखत असून, एक व्यक्ती म्हणून मी कसा आहे हे ते चांगलच जाणतात, असं म्हणत कशा प्रकारे आपण घोषित प्रकल्प पूर्ण केले आहेत हे त्यांनी पाहिलं असल्याची बाबही गडकरींनी अधोरेखित केली.