Publish Date: Wed, 06 Jan 2021 (08:33 IST)
Updated Date: Wed, 06 Jan 2021 (08:35 IST)
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही. राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झालेला नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन राज्याच्या वन विभागाने केले आहे. या क्षणापर्यंत राज्यात कोणत्याही भागात बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही, असे मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितले आहे. मध्य प्रदेशात काही कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळली आहेत. केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही बर्ड फ्ल्यूचा फैलाव झालेला आहे. केरळमध्ये तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्री सुनील केदार यांनीही महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्ये प्रदेश आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यू साधर्म्य असणारी लक्षणे असलेल्या काही कोंबड्या सापडल्याची चर्चा आहे. वास्तविक त्यांना बर्ड फ्ल्यू झालेला नाही, असे सुनील केदार यांनी सांगितले. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत, असे सांगतानाच अन्य काही कारणाने जनावरांचा मृत्यू झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.