Publish Date: Sat, 08 Dec 2018 (09:10 IST)
Updated Date: Sat, 08 Dec 2018 (09:13 IST)
बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरतेवेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने व प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाकडून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. प्रवेश अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र मागितल्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थी प्रमाणपत्रासाठ अर्ज सादर करतात. हा अर्ज केल्यानंतर त्याची परिपूर्ण पडताळणी होऊन प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी अकरावीला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. तसेच हे प्रस्ताव पाठवण्याची जबाबदाारी संबधित माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांकडे सोपवण्यात आली आहे.