Publish Date: Thu, 22 Jul 2021 (22:17 IST)
Updated Date: Thu, 22 Jul 2021 (22:21 IST)
मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील, असा इशारा भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला.
मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असताना राज्य सरकार सामान्य माणसाला उपनगरी रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.