Publish Date: Wed, 11 Mar 2026 (17:10 IST)
Updated Date: Wed, 11 Mar 2026 (17:15 IST)
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाचा वापर कोणत्याही संस्था, ट्रस्ट, सार्वजनिक ठिकाणी करण्यापूर्वी कुटुंबीयांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर होऊ नये या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सुनील कुमार मुसळे यांनी परिपत्रक जारी करून त्याची प्रत राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवली आहे.
अजित पवारांच्या नावाचा विविध उपक्रमाकडून गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या नावाचा वापर कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट, किंवा फाउंडेशनची नोंदणी करताना कुटुंबियांकडून लेखी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी घेणे बंधनकारक असेल. असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी उभारताना शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अजित पवार यांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करणाऱ्या किंवा संशयास्पद कामकाज करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.तसेच आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांना आपले नाव बदलून अजित पवार यांचे नाव वापरायचे असल्यास त्यांनाही याच नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.