Publish Date: Wed, 03 Jan 2018 (18:03 IST)
Updated Date: Wed, 03 Jan 2018 (18:06 IST)
भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला 'महाराष्ट्र बंद' मागे घेतला असल्याची अधिकृत घोषणा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली आहे. बंद शांततेत पार पडल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होती” असे सांगितले.
देशातील काही हिंदू संघटना देशात गोंधळ निर्माण करण्यासाठीच आहेत. काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवाय, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे दोघेजण भीमा-कोरेगाव हिंसाराचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. जो न्याय मुंबई हल्ल्यातील याकूब मेमन याला सुप्रीम कोर्टाने लावला, तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना लावावा, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.