Publish Date: Tue, 01 Dec 2020 (10:16 IST)
Updated Date: Tue, 01 Dec 2020 (10:17 IST)
शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यावरुन भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
“शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं सत्तेनंतरच बदलतं स्वरूप स्पष्ट करणारं आहे. कहर म्हणजे त्यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलण्याचं कधी बोलले नाही तर त्यांनी त्यांच्या आचार विचारावर टीकाच केली” असे प्रविण दरेकर म्हणाले.
“सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मातोश्रीत नमाज पठण केल्याचं मोठं विधान त्यांनी केलं. पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांच्याकडून सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलांजली देणारी वाटचाल येथे सुरु आहे” अशी टीका दरेकर यांनी केली.