Publish Date: Mon, 27 Sep 2021 (15:55 IST)
Updated Date: Mon, 27 Sep 2021 (15:56 IST)
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे सण-वार धुमधडाक्याने साजरा करण्याची मागणी होत आहे. अशात ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाड्या शर्यती व बैलांची झुंज याला देखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तर गृहमंत्री वळसे पाटील यांनी बैलगाडा शर्यतीसाठी वटहुकूम काढण्याची तयारी दाखविली आहे.
जिथे नितेश राणे बैलगाडा शर्यत सुरु करण्याची मागणी करत आहे तर यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज हे ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम असून ते फार पूर्वीपासून थाटाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांनाही सुरू करण्याची परवानगी मिळावी तसंच यात बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य काळजी घेण्यात येईल तसेच नियम व अटींचा पालन करुनच कार्यक्रम केला जाईल म्हणून याला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
तर दुसरीकडे गृहमंत्री यांनी देखील बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी वटहुकूम काढणार असल्याचं म्हटलं.
बैलगाडा शर्यत सुप्रीम कोर्टात प्रलंबित प्रश्न आहे अशात कायद्यामध्ये काही सुधारणा करता येते का या दृष्टीकोनातून प्रयत्न करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.