Publish Date: Tue, 05 Apr 2022 (10:34 IST)
Updated Date: Wed, 05 Oct 2022 (13:23 IST)
कोरोना प्रादुर्भावामुळे जवळपास दोन वर्षांपासून गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने मनमाड, लासलगाव आणि निफाडहून नाशिक, इगतपुरी, मुंबईकडे दररोज अप डाऊन करणाऱ्या चाकरमान्याचे प्रचंड हाल सुरू आहे. प्रवासी संघटनेसह नागरिकांकडून अनेक वेळा निवेदन देऊनही गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने मनमाड येथील गोदावरीचा राजा चारीटेबल ट्रस्ट यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एचसीबीएम ०१०१२२७९२०२२ द्वारे जनहित याचिका दाखल केली आहे.
राज्याच्या अंतर्गत प्रवासासाठी उपयुक्त असणाऱ्या आणि अल्पउत्पन्न गटातील प्रवाशांना परवडणाऱ्या दररोज अपडाऊनसाठीची गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी अनेक वेळा केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांच्या सह रेल्वे बोर्डाला अनेक निवेदन द्वारे दिले आहे मात्र राज्यातून तोट्यात सुरू असलेल्या गाड्यांमध्ये गोदावरी एक्सप्रेस चा समावेश असल्याचे रेल्वे विभागाकडून बोलले जात आहे त्यामुळे गोदावरी एक्सप्रेस सुरू होणे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने प्रवासी संघटनेतर्फे मुंबई उच्च न्यायालय मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबईतून परराज्यांमध्ये जाण्यासाठी गाड्यांची पुरेशी उपलब्धता असताना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी मात्र अद्याप पुरेशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात कोरोना संदर्भात नियम शिथिल करण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करून लवकरात लवकर रेल्वे सुरू व्हाव्या अशी मागणी केली जात आहे.