Publish Date: Thu, 29 Jul 2021 (23:59 IST)
Updated Date: Fri, 30 Jul 2021 (00:01 IST)
राज्य शासनाकडून वारंवार लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला घाबरून आतापासूनच घरात बसायचं का? यांना काय जातं लॉकडाऊन करायला. लॉकडाऊन आवडे सरकारला अशा शब्दांत राज ठाकरेंनी टोला लगावला. राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची पुण्यात भेट घेतली. यावेळस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"लोकांचे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. घर-संसार कसा चालवायचा हे कळत नाहीये, मुलांच्या फी कशा भरायचा, हे माहिती नाही". "यांना लॉकडाऊन करायला काय जातंय. लॉकडाऊन करायचा अन् यांना कोणी प्रश्न विचाराचा नाही", असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. तसेच पी साईनाथ यांच्या पुस्तकाच्या नावाचा संदर्भ घेत सरकारवर लॉकडाऊनवरुन टीका केली. पी साईनाथ यांच्या 'दुष्काळ आवडे सर्वांना' या पुस्तकाप्रमाणे, 'लॉकडाऊन आवडे सरकारला', अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.