Publish Date: Thu, 01 Jun 2017 (17:04 IST)
Updated Date: Thu, 01 Jun 2017 (17:05 IST)
आजपर्यंत इतिहासात शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली नव्हती. मात्र भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही दुदैवी वेळ यावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजपा सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप होत आहे, अशा शब्दात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली. उदगांव येथे स्वाभिमानी दूधाचे संकलन बंद केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर करत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नाबाबत अंर्तमुख होऊन विचार करावा, अन्यथा सध्या खवळलेला शेतकरी कोणती भूमिका घेईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर शासनाने योग्य ते पाऊल उचलून कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची शिफारस मान्य करून शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवावेत, अशी अपेक्षा खा. शेट्टी यांनी व्यक्त केली.