Publish Date: Fri, 24 Jun 2022 (21:29 IST)
Updated Date: Fri, 24 Jun 2022 (21:33 IST)
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडा विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावच लागेल असे वक्तव्य केले होते.तसेच मविआचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. शरद पवार हे धमक्या देत आहेत. बंडखोर आमदारांच्या केसाला धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते. याला आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. पवार साहेबांनी केलेल्या मदतीचे राणेंनी स्मरण करावे म्हणजे त्यांना आपले विधान मागे घ्यावे असे वाटेल असं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, नारायण राणे यांच्या विधानावर महाराष्ट्रातील माणूस कसा पाहतो हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. पवार साहेबांना विधानसभा, लोकसभा, विधिमंडळांचा अनुभव आहे. सभागृहात विधानसभेचे सदस्य आल्यानंतर काय करतात याला जास्त महत्त्व असते हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी काल केला. यावर नारायण राणे यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केले त्या पद्धतीने आम्हालाही बोलता येतं. पण लोकशाहीमध्ये गुंडगिरी करणे योग्य नाही. मात्र काही लोकांच्याकडून अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे राणे जे बोलतात याच्याकडे गांभीर्याने बघू नये असं मला वाटतं असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.