Publish Date: Mon, 04 Apr 2022 (18:35 IST)
Updated Date: Mon, 04 Apr 2022 (18:47 IST)
राज्यभरात महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे. त्यात कोतवालांपासून नायब तहसिलदारांनी सहभाग घेतल्याने त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. आपल्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. बेमुदत या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याने त्याचा थोट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे.
महसूल कर्मचारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. पदोन्नतीची प्रक्रियाही थंडावली आहे. ती विहित वेळेत होत नाही. नायब तहसीलदारांचे सरळसेवेतील भरतीचे प्रमाण सध्या ३३ टक्के आहे ते २० टक्के करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद तयार करावे, पात्र असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग ३ पदावर पदोन्नती द्यावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर संप मागे घेणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.