Publish Date: Tue, 03 Nov 2020 (12:47 IST)
Updated Date: Tue, 03 Nov 2020 (12:36 IST)
कोरोनाच्या संकटकाळात प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या बेस्टसाठीही मदतीचा हात दिल्याचं पाहायला मिळालं. बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोजच्या दररोज भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिले आहेत.
मागील दोन महिने १ हजार बसेस साठी सुमारे४ हजार ५०० पेक्षा अधिक एस.टी. कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडुन जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याकडे केल्या होत्या याची गंभीर दखल घेऊन सदर खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश मंत्री परब यांनी दिले आहे.
परब यांनी दिलेल्या निर्देशानुसार कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोजच्या रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती आणि क्षेत्रिय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 पथके तयार करण्यात आली असून, त्याच्याव्दारे कर्मचाऱ्यांना पुरवविण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.
त्यानुसार एस.टी. प्रशासनाकडुन योग्य ती कार्यवाही करुन, संबंधित एस.टी. कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्याची व्यवस्था आणि चांगल्या दर्जाचे निवासव्यवस्था करण्यात येत आहे.