Publish Date: Fri, 04 Jan 2019 (09:25 IST)
Updated Date: Fri, 04 Jan 2019 (09:29 IST)
लातुरने आपल्या शिक्षणाचा पॅटर्न राज्यातच नव्हे तर देशभर गाजवला. मात्र काही मंडळी हे क्षेत्र आणि लातुरला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई केली जावी अशा सूचना आपण जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. काही महिन्यांपूर्वी एका क्लासेसचालकाचा खून झाला होता. त्यापाठोपाठ एका शिकवणीचालकाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात होती. याची आठवण पालकमंत्र्यांना करुन देण्यात आली तेव्हा त्यांनी उपाययोजनांची माहिती दिली. गृह आणि पोलिस विभागाकडून या घटनांचा आढावा आपण घेतला आहे. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशा प्रवृत्ती मोडून काढण्याच्या सूचना पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत. यापुढे अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यास आणि पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्यास तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.