Publish Date: Sat, 07 May 2022 (15:18 IST)
Updated Date: Sat, 07 May 2022 (15:20 IST)
संपूर्ण महाराष्ट्रात शांतता आहे. काही लोक राज्यातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. पण लोकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याबाबत राष्ट्रीय धोरण ठरवायला हवे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. महागाई हा देशातील सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यावर ना पंतप्रधान, ना अर्थमंत्री किंवा राज्यातील आणि देशातील भाजप नेते बोलत नाहीत. पंजाब आणि महाराष्ट्रातील पोलीस काय करत आहेत याची त्यांना चिंता आहे. भोंग्यांचा मुद्दा संपलाय आता महागाईवर तुटून पडा, सपाटून हा मुद्दा उपस्थित करा, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेला दिले आहे.
राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भोंग्यांच्या प्रश्नावरुन सर्वाधिक हिंदु समाज नाराज आहे. कारण, हहिंदू समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक ठिकाणी काकड आरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपचा एकही नेता महागाईवर बोलताना दिसत नाही. भोंग्यांऐवजी महागाईवर बोला. जनता महागाईने होरपळत आहे आणि त्यावर भाजप नेते बोलत नाहीत ही जनतेची चेष्टा आहे, असे राऊत म्हणाले.