Publish Date: Mon, 26 Nov 2018 (16:05 IST)
Updated Date: Mon, 26 Nov 2018 (16:11 IST)
लहान मुलांकडे लक्ष नसेल तर अनेकदा अनर्थ होतो, असाच काहीसा प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. पालकांच्या हलगर्जीपणा मुळे दोन वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. एका घरातील धार्मिक कार्यक्रमानिमित्त बनत असलेल्या गुलाब जामूनच्या गरम पाकात खेळता खेळता पडल्याने गंभीर भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याचे नाव राजवीर नितीन मेघावाले होते. दलालवाडी भागात ही घटना घडली आहे.
दलालवाडी परिसरात राहत असलेल्या मेघावाले यांच्या कुटुंबात गुरुवारी (दि.२२) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. घराजवळच त्यांनी स्वयंपाक बनविणे सुरू होते. याच ठिकाणी दोन वर्षीय राजवीर खेळत होता. स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेला गुलाब जामूनसाठीचा उकळलेला पाक थंड होण्यासाठी ठेवून घरातील मंडळी कामात व्यग्र होते. त्यावेळी राजवीर अचानक पाकाच्या भांड्यात पडला होता. यानंतर हे समजताच त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर यानंतर अधिक उपचारासाठी राजवीरला घाटी रुग्णालायत दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.