Publish Date: Tue, 28 Apr 2020 (22:29 IST)
Updated Date: Tue, 28 Apr 2020 (22:32 IST)
संपूर्ण देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असतांना काही ठिकाणी पोलिसांवर जमावाने हल्ला करणे, लॉकडाऊनचं पालन करण्यास सांगितल्याने मारहाण करणे असे धक्कादायक प्रकार घडत आहे. राज्यातही गोवंडी, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद याठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असतील तर राज्यात कायद्याचं राज्य उरलंय का? असा प्रश्न निर्माण होतो. लोक जर पोलिसांवर हल्ले करत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.
याबाबत त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, औरंगाबाद आणि पिंपरी येथील घटनांमुळे पोलिसांचं मनोधैर्य जर खचलं तर आजच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ते परवडणारं नाही. पोलिसांवर हात उगारणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणत्याही धर्माचा-समाजाचा असेना, गृहमंत्र्यांनी असा धडा शिकवावा की, पुन्ही तशी चूक करण्याची हिंमत कुणीही करणार नाही असं शालिनी ठाकरे यांनी मागणी केली आहे.