Publish Date: Fri, 16 Sep 2022 (00:10 IST)
Updated Date: Fri, 16 Sep 2022 (00:11 IST)
मुंबई : राज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या केले जात आहेत. या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले की, तळेगाव हा जो स्पॉट आहे, त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाईल साठी अनुकूल आहे. इथं जर हा प्रकल्प असता तर कंपनीला अधिक फायदेशीर असता. त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. महाराष्ट्रामधून हा प्रकल्प जाणे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे, तसे व्हायला नको होते. तसेच या प्रकल्पाचे ठाकरे सरकावर खापर फोडणे चुकीचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि उद्योग मंत्री उद्य सामंत यांचे आरोप चुकीचे असल्याचे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य राज्य असून वाद झाले, तर राज्यामध्ये गुंतवणूक येणार नाही. याशिवाय गुंतवणुकदारांशी संवाद देखील वाढवायला हवा. तसेच नव्या सरकारची गतिमानता चांगली आहे. मात्र सरकारचा कारभार दिसला नसून राज्यकर्ते गतिमान असल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले. तर आताच्या सरकारने राज्यात नवा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावा असेही पवारांनी सांगितले.
तसेच आता या प्रकल्पावर चर्चा करून काहीही उपयोग नसून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मदत केली तर त्यांचे स्वागतच करू असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.