Publish Date: Mon, 09 Dec 2019 (10:15 IST)
Updated Date: Mon, 09 Dec 2019 (10:18 IST)
लोकसभेत सादर होऊ घातलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. आपल्या देशात समस्या कमी नाहीत. त्यामुळे बाहेरची ओझी छाताडावर घेऊ नका, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून देण्यात आला आहे.
'सामना'च्या अग्रलेखात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजप व्होटबँकेचे राजकारण करू पाहत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून या विधेयकाला पर्याय म्हणून दोन प्रस्ताव समोर ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या पर्यायानुसार नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घुसखोर निर्वासितांना आसरा दिल्यास त्यांना पुढील पंचवीस वर्षे मतदानाचा हक्क मिळू नये. अन्यथा मोदी-शहा यांच्या मजबूत इरादे असलेल्या सरकारने ज्याठिकाणी हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारशी, जैन अशा अल्पसंख्याकावर अत्याचार होतात त्या देशांना अद्दल घडवावी. हेच देशाच्या हिताचे आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.