Publish Date: Tue, 19 Feb 2019 (17:46 IST)
Updated Date: Tue, 19 Feb 2019 (17:50 IST)
शिवसेना आणि भाजप यांच्याकडून युतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. जालन्यातही सध्या त्याचा प्रत्यय येत आहे. युती झाली तरी येथील शिवसैनिकांनी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रचार करायला स्पष्टपणे नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर अर्जून खोतकर यांना दानवे यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसेना-भाजप यांच्यातील वितुष्टाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावर रोष आहे. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकणाऱ्या दानवेंच्या विरोधात खोतकर यांना रिंगणात उतरवण्यासाठी येथील कार्यकर्ते आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर यांनीही दानवे यांच्याविरोधात अप्रत्यक्षपणे दंड थोपटले आहेत. युती झाली म्हणून काय झाले? मी अजून मैदान सोडलेले नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.