Publish Date: Sat, 26 Feb 2022 (15:35 IST)
Updated Date: Sat, 26 Feb 2022 (15:38 IST)
इचलकरंजी : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १० तास वीज पुरवठा व्हावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंतांच्या टेबलावर चक्क साप सोडले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध नोंदवत कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.
अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे धावपळ उडाली. यावेळी शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, शेतकऱ्यांची छळवणूक थांबवावी व दिवसा १० तास वीज पुरवठा करा, अशा घोषणा दिल्या आणि अभियंता राठी यांना घेराव घातला. यावेळी अभिषेक पाटील, बसगोंडा बिरादार, गोवर्धन दबडे, अण्णासो शहापूरे, पुरंदर पाटील, रावसाहेब देवमोरे, संजय बेडक्याळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते